मुंबई: महाराष्ट्रात सध्या गुन्हेगारीच्या घटनांनी चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. केतन अग्रवाल प्रकरणाची चर्चा विरते न विरते तोच, नवी मुंबईच्या ऐरोलीतून एक भीषण घटना समोर आली आहे. एका पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. केवळ पती अडसर ठरत होता, म्हणून या महिलेने हत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

या प्रकरणात सुनिता कुशवाह (वय 40) आणि तिचा साथीदार राहुल प्रजापती (वय 30) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बलीराम कुशवाह (वय 50) असे मृत पतीचे नाव होते. सुनिता आणि रिक्षाचालक राहुल यांच्यात अनैतिक संबंध होते. या नात्याबद्दल बलीराम यांना समजल्यानंतर त्यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. पतीचा हा विरोधच त्यांच्या जीवावर बेतला. सुनिताने राहुलच्या मदतीने पतीला कायमचे संपवण्याचा कट रचला.

9 ऑगस्ट 2025 रोजी घरी मुले नसल्याचा फायदा घेत, या दोघांनी बलीराम यांचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे तीन तुकडे करून ते गवळी देव डोंगर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी टाकले. इतकेच नाही, तर त्यानंतर सुनिताने घर बदलले आणि भावाने विचारणा केल्यावर पती सोडून गेल्याची थाप मारली. तब्बल 11 महिने तिने हे सत्य लपवून ठेवले होते. एप्रिल 2026 मध्ये बलीराम बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला.

पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचा वापर करत राहुलच्या कॉल डिटेल्सवर लक्ष केंद्रित केले. वारंवार बदललेले मोबाईल आणि संशयास्पद वागणूक यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि चौकशीअंती दोघांनीही गुन्हा कबूल केला. सध्या पोलीस डोंगराळ भागात मृतदेहाचे अवशेष शोधत आहेत, जे 11 महिन्यांनंतर शोधणे एक मोठे आव्हान बनले आहे. रबाळे एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.







