पुणे: जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला निघाला असून, बुधवारी यवतमध्ये अतिशय भक्तिमय आणि उत्साही वातावरणात सोहळ्याचे आगमन झाले. गळ्यात वीणा, हातात भगव्या पताका, टाळ-मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत हजारो वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

पंढरपूर येथील नगरप्रदक्षिणा पूर्ण करून 29 जुलै रोजी पालखीने परतीचा मार्ग धरला होता. 4 ऑगस्ट रोजी वरवंड येथील मुक्काम संपवून, सकाळी आरती झाल्यानंतर सोहळ्याने देहूच्या दिशेने प्रस्थान केले. त्यानंतर सकाळी साधारण 10.30 च्या सुमारास पालखी यवत येथे पोहोचली. यवतकरांनी वारकऱ्यांचे आणि पालखीचे अत्यंत आदराने व उत्साहाने स्वागत केले.

दुपारच्या विश्रांतीसाठी पालखी सोहळा यवत येथील ऐतिहासिक श्री काळभैरवनाथ मंदिरात थांबला होता. या वेळी स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. यवत येथे वारकऱ्यांसाठी चपाती, भाजी आणि इतर विविध अन्नपदार्थांच्या महाप्रसादाचे मोफत वाटप करण्यात आले. मंदिर परिसर आणि आसपासच्या भागात वारकऱ्यांनी काही वेळ विश्रांती घेतली.

दुपारी सुमारे 1.00 वाजता पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी देहूकडे रवाना झाला. या प्रसंगी श्री काळभैरवनाथ मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध संस्थांचे कार्यकर्ते आणि नागरिक पालखीला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढील मुक्कामाचे नियोजन: यवत येथून निघालेला हा पालखी सोहळा रात्री कुंजीरवाडी येथे मुक्कामी थांबणार आहे. त्यानंतर 6 आणि 7 ऑगस्ट रोजी सोहळ्याचा मुक्काम नवी पेठ येथील श्री विठ्ठल मंदिरात असणार आहे. 8 ऑगस्ट रोजी पालखी पिंपरी गावात मुक्काम करेल. शेवटी, रविवार 9 ऑगस्ट रोजी हा पवित्र पालखी सोहळा आपल्या मूळ स्थानी म्हणजेच श्री क्षेत्र देहू येथे पोहोचेल.






