पुणे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या दृष्टीने राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या संरेखनाचा अभ्यास करण्यासाठी आणि खोडद येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ प्रकल्पावर या रेल्वे मार्गाचा काय परिणाम होऊ शकतो, याची तपासणी करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे माजी अणुऊर्जा आयोग अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.

या अभ्यास समितीत रेल्वे बोर्डाचे सदस्य (इन्फ्रास्ट्रक्चर) विवेक गुप्ता यांच्यासह पुणे आणि नाशिक विभागाच्या आयुक्तांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील 60 दिवसांच्या आत ही समिती आपला सविस्तर अहवाल सरकारला सादर करेल. समितीच्या अहवालानंतर या प्रकल्पाच्या पुढील कामाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी म्हणजेच 3 जुलै आणि 29 जुलै रोजी पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या संदर्भात महत्त्वाच्या बैठका पार पडल्या होत्या. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय तत्परतेने घेतला आहे.

संगमनेर मार्गे हा सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग तयार व्हावा यासाठी सरकार पातळीवर विशेष प्रयत्न सुरू आहेत. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे संगमनेरकरांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत. हा रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यास पुणे आणि नाशिक दरम्यानचा प्रवास अत्यंत वेगात आणि सुखकर होणार आहे.






