पुणे: राज्यात गाजलेल्या केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज सोमवारी वडगाव सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात युक्तिवादादरम्यान पोलिसांनी पुन्हा एकदा ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली. यापूर्वी या दोघांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, तिची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा कोर्टासमोर उभे केले होते.

हत्येचा कट कोणी रचला आणि त्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर करणे, तसेच अनेक तांत्रिक बाबींचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले. घटनेचे पुन्हा रिक्रिएशन करायचे असल्याने कोठडीची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

याला आरोपींच्या वकिलांनी जोरदार विरोध केला. सिया गोयलचे वकील ॲड. विपुल दुशिंग यांनी सांगितले कि, सिया तपासात पूर्ण सहकार्य करत आहे आणि केतन अग्रवालचा फोन आधीच पोलिसांकडे जमा असल्याने डिजिटल पुरावे त्यांच्याकडे आहेत, मग कोठडी कशाला हवी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
चेतन चौधरीचे वकील शहाणे यांनीही युक्तिवाद करताना सांगितले की, एफआयआरमध्ये त्यांचे नाव केवळ दोनदाच आले आहे. पोलिसांनी आधीच दुचाकी आणि हुडी जप्त केली आहे, तांत्रिक तपास करायचा असल्यास त्यासाठी आरोपींची कोठडी आवश्यक नाही, त्यामुळे त्यांना कारागृहात वर्ग करावे, अशी मागणी बचाव पक्षाने केली.







