उरुळी कांचन, (पुणे) : रात्रीच्या अंधारात किंवा संधी साधून कचऱ्याने भरलेले ट्रक आणि पिकअप गाड्याची थेट उरुळी कांचनजवळील शिंदवणे (ता. हवेली) घाट परिसरात विल्हेवाट लावली जात आहे. यामुळे संपूर्ण शिंदवणे घाटात आणि मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून तीव्र दुर्गंधीमुळे वाहनधारक व स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

विशेष म्हणजे, हा सर्व परिसर वनविभागाच्या हद्दीत आणि संरक्षित क्षेत्रात येत असतानाही संबंधित अधिकारी व प्रशासनाकडून या गंभीर प्रकाराकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. घाटातील वळणांवर आणि रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, हॉटेलमधील शिळे अन्न, वैद्यकीय टाकाऊ पदार्थ व इतर ओला-सुका कचरा टाकला जात आहे. वाऱ्यामुळे आणि भटक्या प्राण्यांमुळे हा कचरा थेट मुख्य रस्त्यावर विखुरला जात आहे.

पावसाळ्याचे दिवस असल्याने या कचऱ्यात पाणी साचून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे, तसेच डास व माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. घाटातून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना आणि पर्यटकांना तोंडाला रुमाल लावूनच प्रवास करावा लागत आहे. तसेच रस्त्यावर पसरलेल्या कचऱ्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, शिंदवणे घाट हे निसर्गरम्य क्षेत्र असून येथे मोठ्या प्रमाणावर वन्यजीव आणि वनस्पती आहेत. अशा संवेदनशील वनक्षेत्रात उघडपणे कचऱ्याचे डंपिंग होत असताना वन विभागाचे गस्ती पथक नेमके काय करत आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
“प्रशासनाच्या आणि वन विभागाच्या ढिम्म कारभारामुळे शिंदवणे घाटाला ‘कचरा डेपो’चे स्वरूप आले आहे. याप्रकरणी प्रशासनाने तात्काळ सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि तपास यंत्रणेच्या आधारे बेकायदेशीर कचरा टाकणाऱ्या गाड्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश शितोळे यांनी केली आहे.







