भोपाळ : माजी मिस पुणे आणि मॉडेल-अभिनेत्री ट्विशा शर्मा हिच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात ट्विशाने मृत्यूपूर्वी आपल्या वहिनीला पाठवलेल्या शेवटच्या मेसेजचा उल्लेख करण्यात आला आहे. पती समर्थ सिंग आणि सासू गिरीबाला सिंग यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

12 मे रोजी रात्री 9:36 वाजता ट्विशाने वहिनी राशी अब्रोल शर्मा यांना मेसेज केला होता. त्यात तिने पतीला तिच्या उरलेल्या वस्तू घेऊन जाण्यास सांगितले आणि आपल्याला शांततेत मरू देण्याची विनंती केली होती. याआधीही तिने वहिनीशी फोनवर पतीसोबतच्या वादांबाबत चर्चा केली होती.

CBIच्या माहितीनुसार, त्याच दिवशी संध्याकाळी ट्विशाने राशीला फोन करून समर्थकडून 20 लाख रुपये चिनी शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी देण्याचा दबाव असल्याचे सांगितले होते. तिने याला नकार दिल्याचेही सांगितले.

रात्री सुमारे 9:20 वाजता ट्विशाने पुन्हा वहिनीला फोन केला. पाठदुखीमुळे तिने समर्थला दुसऱ्या खोलीत झोपण्यास सांगितले होते. यावरून समर्थ आक्रमक झाला आणि त्यांच्यात वाद झाल्याचे तपासात नमूद आहे. त्यानंतर काही वेळाने ट्विशाने शेवटचा मेसेज पाठवला.
CBIच्या आरोपपत्रानुसार, रात्री 9:40च्या सुमारास ट्विशा घराच्या गच्चीकडे एकटी जाताना CCTVमध्ये दिसली. त्यानंतर तिने वडिलांना WhatsApp कॉल केला. ती रडत होती आणि समर्थ खूप चिडल्याचे सांगत कुटुंबीयांना तातडीने भोपाळला येण्यास सांगितले.
रात्री 10:05 वाजता ट्विशाने आईला शेवटचा फोन केला. त्यानंतर कुटुंबीयांनी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
शवविच्छेदन आणि एम्स दिल्लीच्या तज्ज्ञांच्या पुनरावलोकनानुसार ट्विशाचा मृत्यू गळफासामुळे झाल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. CBIने समर्थ सिंग आणि गिरीबाला सिंग यांच्याविरोधात क्रूरता, आत्महत्येस प्रवृत्त करणेसह संबंधित कलमांखाली आरोप दाखल केले आहेत.
मात्र, ट्विशा आणि समर्थ यांच्या फोनमधील डेटाचे पूर्ण फॉरेन्सिक विश्लेषण तसेच CCTV DVR फुटेज मिळणे अद्याप बाकी असल्याचे CBIने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.







