पुणे : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिक आणि राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका चालू वर्षाऐवजी आता 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ‘एसआयआर’ प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे राज्य निवडणूक आयोगासमोर मोठा तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय प्रत्यक्ष निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार नाही.

प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एसआयआर’ ची सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात अंतिम मतदार यादी जाहीर केली जाऊ शकते. मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरच निवडणूक आयोग अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल. या संपूर्ण प्रक्रियेला लागणारा वेळ पाहता प्रत्यक्ष मतदान डिसेंबर 2026 किंवा जानेवारी 2027 मध्ये पार पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मुदत संपलेल्या या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवर सध्या प्रशासक काम पाहत आहेत. आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अंतिम तारीख नक्की काय असेल, हे सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या आगामी सुनावणी आणि न्यायालयाच्या अंतिम निर्णयावरच पूर्णपणे अवलंबून असणार आहे







