लोणी काळभोर, ता. 8 : पुणे–सोलापूर महामार्गावर दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूककोंडी आता भीषण स्वरूप धारण करत असून, ती नियंत्रणात आणण्यात लोणी काळभोर वाहतूक पोलिस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या घोषणा केवळ कागदावरच असल्याचे या परिस्थितीतून स्पष्ट होत असून, नागरिकांचा संताप उफाळून आला आहे.

बुधवारी (ता. 8) पहाटे महामार्गावर अचानक एक कंटेनर बंद पडल्याने परिस्थिती आणखी बिघडली. कवडी पाट टोल नाका ते थेऊरदरम्यान तब्बल 5 ते 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. साधारण 10 मिनिटांचा प्रवास तब्बल 45 मिनिटांहून अधिक वेळात पूर्ण करावा लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले.
सकाळी कामावर जाण्याची आणि सायंकाळी घरी परतण्याची वेळ म्हणजे या महामार्गावर अक्षरशः वाहनांचा महापूर उसळतो. किलोमीटरच्या अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. या कोंडीत अडकून शालेय विद्यार्थी, नोकरदार, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांनाही मोठा विलंब सहन करावा लागत आहे. मात्र, या गंभीर परिस्थितीत वाहतूक पोलिसांची भूमिका केवळ बघ्याची असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
महामार्गावरील अनियोजित पार्किंग, रस्त्यावर उभे असलेले अवजड वाहन, फेरीवाले आणि नियमांचे उघड उल्लंघन करणारे वाहनचालक यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. तरीही यावर ठोस कारवाई करण्याऐवजी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पोलिसांचा पूर्ण अभाव, तर काही ठिकाणी केवळ नावापुरती उपस्थिती दिसून येते.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कोणतीही ठोस योजना राबवली जात नसल्याची टीका होत आहे. सिग्नल व्यवस्थापन अपुरे, डायव्हर्जनची योग्य आखणी नाही, तसेच गर्दीच्या वेळेत अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, दररोज नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांनाही मार्ग काढणे कठीण जात असल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तरीही प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे.
दरम्यान, “वाहतूक पोलिस नेमके काय करत आहेत?” असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत असून, तातडीने कडक आणि प्रभावी उपाययोजना राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, ही वाहतूककोंडी भविष्यात आणखी गंभीर रूप धारण करेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.







