पुणे: पुण्यातील वाढती वाहनसंख्या आणि त्यामुळं दिवसेंदिवस वाढणारी वाहतूककोंडी पुणेकरांसाठी मोठी समस्या बनली आहे. जगातील सर्वाधिक वाहतूककोंडी असलेल्या शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पाषाण, पंचवटी आणि कोथरूडला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी बोगदा प्रकल्पाला आता गती मिळण्याची शक्यता आहे.

पुण्यातील हा पहिला शहरी रस्ता बोगदा प्रकल्प असणार आहे. प्रस्तावित बोगद्याची लांबी सुमारे 3 किलोमीटर असून, तो पाषाण-पंचवटी-कोथरूड या मार्गाला जोडणार आहे. या प्रकल्पामुळे गर्दीच्या वेळेत या भागातील वाहतुकीचा मोठा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.

सध्या पाषाण ते कोथरूड जाण्यासाठी वाहतूककोंडीमुळे अनेकदा जवळपास 40 मिनिटे लागतात. बोगदा सुरू झाल्यानंतर हाच प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

प्रकल्प पुढे नेण्यासाठी पुणे महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. सल्लागाराची नियुक्ती झाल्यानंतर प्रस्तावित मार्गाचा सविस्तर तांत्रिक अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर अंतिम आराखडा तयार केला जाईल.
पुण्यातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि अरुंद होत चाललेली वाहतूक क्षमता पाहता हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. बोगद्यामुळे पाषाण, पंचवटी आणि कोथरूड परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होऊ शकते.







