पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शनिवारी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. RTO कार्यालयाजवळील SSPMS प्रशालेच्या मैदानावर दुपारी 4:30 ते रात्री 9:30 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच शहरातील विद्यार्थी संघटनांमध्ये वाद निर्माण झाला. शुक्रवारी रात्री COEP कॉलेजच्या वसतिगृह परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि काँग्रेसशी संबंधित NSUI कार्यकर्त्यांमध्ये कॉलेजच्या शुल्काच्या मुद्द्यावरून जोरदार वाद झाला. दोन्ही गटांकडून घोषणाबाजी झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या घटनेनंतर घटनास्थळी भेट दिली.

या वादानंतर ABVPकडून काँग्रेसवर गंभीर आरोप करण्यात आले. COEPमधील एका विद्यार्थिनीवर शुल्काच्या मुद्द्यावरून दबाव आणला जात असल्याचा दावा संघटनेच्या कार्यकर्त्याने केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. विद्यार्थिनीची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे ABVPकडून सांगण्यात आले.

दरम्यान, आज होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मैदानात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी 700 वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी आयोजकांना आक्षेपार्ह फलक किंवा चित्रे न लावण्याच्या तसेच धार्मिक भावना दुखावतील अशी वक्तव्ये टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.







