शिरूर: पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर बायपास येथे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आहे. अपघात रोखण्यासाठी वारंवार मागण्या करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज यांनी तहसीलदार कार्यालयासमोरील आंदोलनस्थळी प्रतीकात्मक तिरडी मांडून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला.

आंदोलनस्थळी अपघातांत बळी गेलेल्यांची प्रतीकात्मक शवयात्रा, अस्ताव्यस्त वाहने व अपघातांची दृश्ये उभी करून परिस्थितीचे गांभीर्य प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची छायाचित्रे तिरडीजवळ ठेवून प्रशासनाच्या वेळकाढूपणावर नाराजी व्यक्त करण्यात आली.

शिरूर शहर हद्दीत महामार्गावरील सात ठिकाणी काँक्रीट दुभाजक तोडून अनधिकृत कट तयार करण्यात आल्याचे समोर आले असून,याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धोकादायक कट,अपुरी प्रकाशव्यवस्था,सुरक्षित यू-टर्नचा अभाव, झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल, सेवारस्ते, रंबल स्ट्रिप्स व क्रॅश बॅरियर्सचा प्रश्न गंभीर आहे.

काही दिवसांपूर्वी शिरूर शहर परिसरात संग्राम हॉटेल आणि व्हिजन इंटरनॅशनल स्कूल परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्यानंतर बायपासच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संपूर्ण बायपासचे रोड सेफ्टी ऑडिट करून कालबद्ध कृती आराखडा राबवावा,अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी व नागरिकांनी केली आहे.
प्रशासनाने पाहणी व आश्वासनांपलीकडे जाऊन प्रत्यक्ष उपाययोजना कराव्यात. “आज आंदोलनस्थळी प्रतीकात्मक तिरडी आहे; उद्या ती पुन्हा खरी ठरू नये,” हीच शिरूरकरांची अपेक्षा आहे.







