न्हावरे: ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेच्या सुंदरबन फळे आणि पालेभाज्या प्रक्रिया क्लस्टरला सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या स्मृती क्लस्टर तसेच खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूप राशी यांनी भेट देऊन क्लस्टरच्या कामकाजाची माहिती घेतली. शेतकरी व कारागिरांनी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर्जेदार उत्पादन पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ,चांगला भाव आणि अधिक उत्पन्न मिळवून देणे,तसेच रोजगारनिर्मिती करणे हा क्लस्टरचा प्रमुख उद्देश आहे. सौरऊर्जेसारख्या हरित ऊर्जेचा वापर करून कमी खर्चात उत्पादन घेण्याबरोबरच प्रदूषणमुक्त क्लस्टर उभारण्यावर भर देण्यात येत आहे. शासकीय विभागांशी समन्वय साधून उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शनांमध्ये सहभागी करून घेण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

महिलांच्या सहभागातून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असून,त्यांच्या उत्पन्नातून मुलांचे शिक्षण व आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे.आयुष मंत्रालयासह विविध विभागांच्या समन्वयातून सुंदरबन क्लस्टरचा मोठा ब्रँड निर्माण करण्याचा सल्लाही देण्यात आला.

राज्य संचालक योगेश भामरे यांनी पिकांचे नियोजन,कच्चा माल, उत्पादन लक्ष्य व शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या.ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरविंद शाळिग्राम यांनी गुणवत्तेसाठी पुणे विद्यापीठात संशोधन सुरू असल्याचे सांगितले.उत्पादनाचे ऑडिट व प्रमाणन करून त्यानुसार विक्री केली जाते.अशी माहिती त्यांनी दिली.
क्लस्टरचे अध्यक्ष गिताराम कदम यांनी कौशल्य प्रशिक्षण,सेवा, रोजगारनिर्मिती आणि उत्पादनवाढ ही उद्दिष्टे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी क्लस्टरचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले.याप्रसंगी युवराज जगताप,सुशील येवले,जयंती कदम, ॲड.महिपती काळे, तुकाराम मचाले,संजय शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.






