पोपटराव पाचंगे
रांजणगाव गणपती/प्रतिनिधी – अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती, ता. शिरूर येथील श्री महागणपती मंदिर येथे व्यापक जतन व दुरुस्तीच्या कामांना सुरुवात होत असून, त्यासाठी मंदिर येत्या 31 जुलैपर्यंत म्हणजे साडेतीन महिने भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सात मंदिरांच्या विकास आराखड्याअंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. याबाबतची माहिती पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाणे यांनी रांजणगाव येथे आज मंदिर सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, रांजणगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती तसेच जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेनंतर पुरातत्व विभागाकडून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याची संरचना, सभामंडप तसेच परिसरातील पायाभूत सुविधांची दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यानुसार महागणपती मंदिर येत्या 31 जुलैपर्यंत म्हणजे साडेतीन महिने भाविकांना दर्शनासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने बुधवार, दि. 15 एप्रिल पासून 31 जुलै 2026 पर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णतः बंद राहणार आहे. या कालावधीत मंदिरातील नित्यपूजा, धार्मिक विधी आणि परंपरागत सेवा नियमितपणे सुरू राहतील, मात्र कोणत्याही भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात येत असून, मंदिराबाहेरील ठिकाणी एलईडी स्क्रीनद्वारे थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या भाविकांना किमान एलईडी स्क्रीनद्वारे दर्शनाची सोय मिळणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर काम सुरू असणार असल्यामुळे, संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा उपाय उभारण्यात येणार आहेत. कामाच्या ठिकाणी अनधिकृत प्रवेश पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असून, प्रशासनाकडून विशेष देखरेख ठेवली जाणार आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत मुख्य दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानंतर उर्वरित किरकोळ कामे टप्प्याटप्प्याने सुरू राहतील, असेही यावेळी सांगण्यात आले.
दरम्यानच्या कालावधीत मंदिर व मंदिर परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची विशेष दक्षता महसूल व पोलीस प्रशासनाकडून घेतली जाणार असल्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व रांजणगावचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी यावेळी सांगितले.







