पुरंदर: पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी गावात जमिनीच्या वादातून (Purandar News) थेट गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात वाढत चाललेल्या शस्त्रसज्ज गुन्हेगारीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. (Pune Crime)

या प्रकरणी विकी मुरली राजपूत वय 30, रा. शिक्रापूर, सध्या उदाचीवाडी यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी राजपूत, त्यांचा मावशीचा मुलगा पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड आणि पृथ्वीराजचे वडील उत्तरसिंग राठोड यांच्यात चाकण येथील एक गुंठा आणि वाकड येथील एक गुंठा जागेच्या मालकीवरून दीर्घकाळ वाद सुरू होता.
या वादातून आरोपींनी विकी राजपूत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीप्रकरणी 5 फेब्रुवारी 2026 रोजी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी हा वाद अधिक गंभीर वळणावर गेला.
6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास विकी राजपूत हे उदाचीवाडी येथील त्यांच्या घरी असताना पृथ्वीराज राठोड आणि त्यांचे वडील उत्तरसिंग राठोड हे त्यांच्या घराबाहेर आले. त्यांनी आरडाओरडा करत शिवीगाळ केली आणि विकी राजपूत यांना घराबाहेर येण्यास सांगितले. विकी राजपूत बाहेर येत नसल्याचे लक्षात येताच आरोपींनी थेट त्यांच्या घरावर गोळीबार केला. घराच्या खिडकीवर आणि भिंतीवर गोळ्या झाडण्यात आल्या.
गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने शेजारील नागरिक जागे झाले. लोक गोळा होत असल्याचे पाहून आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी प्रकार अत्यंत गंभीर आहे.
नुकताच वाघापूर येथेही अशाच स्वरूपाचा गोळीबाराचा प्रकार घडला होता. सातत्याने पुरंदर तालुक्यात घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सासवड पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. जमिनीच्या वादातून थेट गोळीबारापर्यंत गेलेला हा प्रकार कायदा आणि सुव्यवस्थेसाठी गंभीर इशारा मानला जात आहे.






