पुणे: पुण्यातील (Pune News) वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रस्तावित करण्यात आलेला महत्त्वाकांक्षी येरवडा ते कात्रज बोगदा प्रकल्प आता केवळ कागदावरच राहणार आहे. पुण्याच्या उत्तर ते दक्षिण भागाला जोडण्यासाठी 20 किलोमीटर लांबीचा हा बोगदा तयार करण्याचे नियोजन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) केले होते. दरम्यान, या प्रकल्पाच्या प्रचंड खर्चामुळे आणि उपयुक्तेमुळे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याला विरोध केला आहे. या निर्णयामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील आणखी काही प्रस्तावित बोगदा प्रकल्पही गुंडाळले जाणार आहेत.

प्रकल्पाचा खर्च महापालिकेला परवडणारा नाही:

- ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणा’च्या (PUMTA) बैठकीत या प्रकल्पावर चर्चा झाली. यावेळी आयुक्त राम यांनी हा प्रकल्प महापालिकेला करणे शक्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
- मोनार्क या एजन्सीने या बोगद्याचा जो प्राथमिक अहवाल सादर केला होता, त्यानुसार 18 ते 20 किमी लांबीच्या सहा लेनच्या दोन मार्गांसाठी तब्बल 7500 कोटी रुपयांचा प्रचंड खर्च अपेक्षित होता.
- केवळ 20 किमीच्या रस्त्यासाठी एवढा प्रचंड खर्च महापालिकेला परवडणारा नाही, तसेच या मार्गाचा उपयोग अपेक्षेइतका न होण्याची शक्यता आहे, असे मत आयुक्त राम यांनी व्यक्त केले.
त्यामुळे येरवडा ते कात्रज या बोगद्याची संकल्पना महापालिकेच्या पातळीवर गुंडाळल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय शनिवारवाडा ही ‘हेरीटेज’ वास्तू असल्यामुळे तिच्या 100 मीटर परिसरात खोदकाम किंवा बांधकामाला परवानगी नाही. यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येणे अशक्य असल्याचेही स्पष्ट झाले आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली बोगद्याची संकल्पना आयुक्तांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे आता फक्त कागदावरच राहणार आहे.








