पुणे: राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी व्यवहारामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीने 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांना विकत घेतली. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करून हा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला, त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले. वाद वाढल्यानंतर, अमाडिया कंपनीनेखरेदी व्यवहार रद्द करत असल्याचे सांगितले. तरीही वाद मात्र शांत झाला नाही.

लक्ष्मण हाकेंची टीका:
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. हाके यांनी ‘मुळशी पॅटर्न 2’ हा चित्रपट पार्थ पवारांच्या या ‘ जमीन घोटाळ्यावर’ बनावा, अशी टिप्पणी केली आहे. हाके यांनी पुढे सांगितले कि, पार्थ पवार यांना लहानपणापासूनच जमीन लाटण्याची कला शिकवण्यात आली आहे. पार्थ हा लहान असतांनाच अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या सोनगावमधील 3 एकर ‘महार वतन’ जमीन लाटून त्यांच्या नावावर केली होती. “बापाने 70 हजार कोटी पचवले सुद्धा आणि साधी ढेकरही दिली नाही. त्यामुळे ‘नया है वह’ म्हणत पार्थ पवारांनाही या 1500 कोटींच्या घोटाळ्यात सोडून दिले जाईल.” अशी टिका केली आहे.
नवा जमीन घोटाळा करताना जुन्या चुका टाळण्याचा सल्ला?
लक्ष्मण हाके यांनी पार्थ पवारांना नवा जमीन घोटाळा करताना जुन्या चुका टाळण्याचा सल्ला देत सांगितले कि, शेकडो कोटींचा व्यवहार केवळ 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करू नये, भविष्य काळात मोठ्या जागांवर हात मारावा, भागभांडवल कमी असलेल्या संस्थेच्या माध्यमातून 300 कोटींचा व्यवहार करू नये, सरकारी खात्याची जमीन खासगी कंपनीकडे घेताना अधिक काळजी घ्यावी.
पवारांच्या हातात जमिनी गायब करण्याची जादूची कांडी
‘पवारांच्या हातात जमिनी गायब करण्याची जादूची कांडी आहे, त्याचे व्यवस्थित प्रशिक्षण पार्थ पवारांनी घ्यावे,’ असेही ते म्हणाले. दरम्यान, पार्थ पवार यांनी ‘महार वतनाची’ जमीन कंपनीच्या नावावर केली तेव्हा नेमके काय घडले, याची सत्यता महाराष्ट्रासमोर येईल असे वाटत नाही, अशी शंकाही हाके यांनी व्यक्त केली आहे.







