पुणे: राज्यात सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवण्याबाबत महायुतीमध्ये मतभेद असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे मोठे संकेत दिले आहेत. महायुतीतील तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र निवडणुका लढवण्याची भूमिका घेतली असली अजित पवार यांनी दिलेल्या संकेतामुळे निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये काहीतरी खलबत सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, तब्बल आठ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या दरम्यान राज्याच्या राजकीय पटलावर मोठे फेरबदल झाले असून, काही नवीन पक्षही सक्रिय झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला निवडणुकीत संधी मिळावी अशी अपेक्षा असणे स्वाभाविक आहे.दरम्यान, स्थानिक पातळीवर राजकीय परिस्थिती बदलली असल्याचे कार्यकर्त्यांचे मत असल्याने, स्थानिक नेत्यांना स्वतःच्या पातळीवर निवडणुका कशा लढवायच्या, याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार दिला जाईल.
या संदर्भात अजित पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता पक्षातील नेते आणि कार्यकर्ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे मत व्यक्त करत आहेत. यामुळे, आम्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत आहोत. दरम्यान, अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उदाहरण देत सांगितले की, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका वगळल्यास, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष नेहमीच स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आले आहेत. त्यामुळे स्थानिक नेत्यांशी आणि परिस्थितीनुसार चर्चा करूनच निवडणुकीच्या रणनीतीवर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांच्या वक्तव्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीची एकजूट कायम राहणार की नाही, यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक नेत्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार देण्याचे संकेत दिल्याने, महायुतीमध्ये निवडणूक स्वबळावर लढण्याचे मतप्रवाह अधिक प्रबळ होण्याची शक्यता आहे. जर सगळे पक्ष स्वबळावर लढले तर या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल, परंतु या मतभेदांचा अंतिम परिणाम महायुतीच्या भविष्यातील राजकारणावर काय होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.






