पुणे: पुणे (Pune News) महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला शहरात मोठा राजकीय धक्का बसला आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेनेच्या १० नगरसेवकांपैकी आता एकही नगरसेवक ठाकरे गटात शिल्लक राहिलेला नाही. शेवटच्या दोन माजी नगरसेवकांनीही पक्षाला जय महाराष्ट्र केल्याने आता पुण्यात ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा एकही नगरसेवक नाही. निवडणुकीच्या तोंडावर सर्व अनुभवी चेहरे सोडून गेल्यामुळे पक्षासमोर मोठे संकट उभे राहिले असून कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
शिवसेनेत उभी फूट पडली तेव्हा पुण्यातील १० पैकी ९ नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले होते. केवळ नाना भानगिरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र, गेल्या ३ वर्षांच्या काळात राजकीय समीकरणे वेगाने बदलली आणि ठाकरे गटातील नगरसेवकांनी एकामागून एक पक्ष सोडण्यास सुरुवात केली. काही नगरसेवक शिंदे गटात गेले तर काहींनी इतर पक्षांची वाट धरली. आता शेवटच्या दोन नगरसेवकांनीही साथ सोडल्यामुळे ठाकरे गटाला जबर धक्का बसला आहे.

या गळतीमुळे आता पुण्यातील शिवसेनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरेंना काही करावे लागणार आहे.पुणे महापालिकेत शिवसेनेची पूर्वीसारखी ताकद निर्माण करण्यासाठी ठाकरे गटाला आता शून्यापासून नवी बांधणी करावी लागणार आहे. पक्षासाठी हा मोठा सेटबॅक मानला जात असून ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत हे नुकसान कसे भरून काढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.







