Pune Crime : पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सुरक्षित प्रवासाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूर ते पुणे दरम्यान धावणाऱ्या ई-शिवाई बसमध्ये चालकाच्या वागणुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एसटी प्रशासनावर टीका होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस कोल्हापूरहून पुण्याकडे येत होती. प्रवासादरम्यान चालक बस अतिशय वेगात आणि धोकादायक पद्धतीने चालवत होता. वारंवार अचानक ब्रेक लावणे, बस वळवताना नियंत्रण न ठेवणे आणि सतत हॉर्न वाजवणे यामुळे प्रवासी घाबरले होते. काही प्रवाशांनी चालकाला शांतपणे बस चालवण्याची विनंती केली असता त्याने उलट प्रवाशांशी वाद घालत अयोग्य भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हा वाद वाढत गेला आणि कराडजवळ चालकाने अचानक बस थांबवली. जाब विचारणाऱ्या फाळके नावाच्या प्रवाशाला आणि त्यांच्या पत्नीला मध्यरात्री बसमधून खाली उतरवण्यात आले. निर्जन ठिकाणी अशा प्रकारे दाम्पत्याला उतरवण्यात आल्याने इतर प्रवासी संतप्त झाले. त्यांनी चालकाच्या या वर्तनाचा निषेध करत बस पुढे जाऊ दिली नाही.
प्रवाशांच्या विरोधामुळे अखेर चालकाला त्या दाम्पत्याला पुन्हा बसमध्ये घेण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर बस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. या घटनेमुळे एसटीच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची दखल एसटी प्रशासनाने घेतली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित चालकावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कडक पावले उचलण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.







