लोणी काळभोर, ता. ४ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्रकरणामुळे २२ हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या भीषण दुर्घटनेनंतर पोलिसांनी उरुळी कांचन येथील राजू (राधेलाल) प्रजापती याला अटक केली, तर त्याच्याशी आर्थिक संबंध उघड झाल्याने चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, या संपूर्ण प्रकरणातील प्रजापतीचे उजवे-डावे दोन ‘आका’ अजूनही कायद्याच्या कचाट्यात आले नसल्याने पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, प्रजापतीला अटक झाली, पण अनेक वर्षांपासून हातभट्टी दारूच्या अवैध व्यवसायातून कोट्यवधींची माया गोळा करणारे आणि ऐषआरामाचे जीवन जगणारे कथित ‘मोठे मासे’ नेमके कुठे आहेत? त्यांच्यापर्यंत तपासाची साखळी का पोहोचत नाही? की त्यांना जाणीवपूर्वक संरक्षण दिले जात आहे? अशी चर्चा सध्या स्थानिक नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.

उरुळी कांचन परिसरात हातभट्टी दारूचा व्यवसाय काही दिवसांचा नसून अनेक वर्षांपासून खुलेआम सुरू असल्याचे बोलले जात आहे. दादाने अवैध धंद्यांतून कमावलेल्या काळ्या पैशातून आलिशान थार , मालमत्ता आणि मोठे आर्थिक साम्राज्य उभे राहिल्याची चर्चा आहे. उरुळी कांचनमध्ये हातभट्टी दारूचा अक्षरशः ‘लोंढा’ वाहत असताना स्थानिक यंत्रणा नेमकी काय करत होती, असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. या प्रकरणात केवळ एका व्यक्तीवर कारवाई करून तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंकाही व्यक्त होत आहे. कारण मृतांचा आकडा वाढत असताना आणि संपूर्ण राज्य हादरलेले असताना, या साखळीमागील मोठ्या नावांवर अद्याप ठोस कारवाई झालेली दिसत नाही.
या प्रकरणात उरुळी कांचन, यवत आणि दौंड येथील चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच उरुळी कांचनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. मात्र, एवढ्यावरच जबाबदारी संपते का? अनेक वर्षे सुरू असलेल्या अवैध धंद्यांना संरक्षण कोणी दिले, त्यातून कोणाचा फायदा झाला आणि स्थानिक पातळीवरील साखळी किती खोलवर रुजली आहे, याचा सखोल तपास होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
विषारी दारू प्रकरणानंतरही परिसरातील अवैध धंद्यांवर पूर्णपणे लगाम लागलेला नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. हातभट्टी, मटका आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांविषयी गावात उघडपणे चर्चा होत आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला नसल्याचे चित्र दिसत आहे.आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, प्रजापतीनंतर पुढचा क्रमांक कोणाचा? आणि ‘मोठे मासे’ खरोखरच कायद्याच्या जाळ्यात अडकणार की पुन्हा एकदा पडद्यामागेच राहणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नव्या वरिष्ठ निरीक्षकांसमोर मोठे आव्हान
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी विजयमाला पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या खांद्यावर आता केवळ विषारी दारू प्रकरणाचा सखोल तपासच नाही, तर परिसरातील अवैध धंद्यांचे कथित जाळे उद्ध्वस्त करण्याचे मोठे आव्हान आहे. २२ हून अधिक जीव गेलेल्या या प्रकरणात केवळ लहान-मोठ्या कारवायांनी जनतेचे समाधान होणार नाही. या मृत्यूंसाठी जबाबदार असलेली संपूर्ण साखळी उघड झाली पाहिजे आणि कितीही प्रभावशाली असले तरी संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







