फुरसुंगी, ता. 4 : लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार दबाव, शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळ सहन करावा लागल्याचा गंभीर आरोप एका विवाहितेने केला आहे. पतीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आणण्यास भाग पाडल्याचा तसेच वारंवार अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत महिलेने पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्याविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पती रोहित गौतम जाधव, सासू लंका जाधव, सासरे गौतम भगवान जाधव, दीर सागर जाधव आणि नणंद छाया कांबळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका २९ वर्षीय विवाहितेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विवाह १ मे २०२२ रोजी रोहित गौतम जाधव याच्याशी झाला होता. लग्नासाठी माहेरच्या कुटुंबाने सुमारे साडेबारा लाख रुपये खर्च केल्याचा तसेच सोन्याचे दागिने व संसारोपयोगी साहित्य दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस संसार सुरळीत सुरू होता. मात्र, हनिमूनवरून परतल्यानंतर पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांनी किरकोळ कारणांवरून वाद घालण्यास सुरुवात केली. हनिमूनचा खर्च आणि पतीवरील तीन लाख रुपयांचे कर्ज माहेरून आणण्याची मागणी करत वारंवार मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संसार टिकावा म्हणून फिर्यादी यांच्या वडिलांनी व्याजाने तीन लाख रुपये उभे करून पतीला दिले. तरीही छळ थांबला नाही. “तू दिसायला चांगली नाहीस, मी जबरदस्तीने लग्न केले,” अशा शब्दांत पतीकडून वारंवार अपमान करण्यात येत असल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच, अपत्य होत नसल्याच्या कारणावरून “तू वांझोटी आहेस” असे टोमणे मारून मानसिक छळ करण्यात आला. माहेरी जाण्यावरही निर्बंध घालण्यात आले असून, विरोध केल्यास शिवीगाळ व मारहाण होत असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे.
सततच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने माहेरी आश्रय घेतला. त्यानंतर तिने फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेत पती रोहित गौतम जाधव, सासू लंका जाधव, सासरे गौतम भगवान जाधव, दीर सागर जाधव आणि नणंद छाया कांबळे यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस पुढील तपास करीत आहेत.







