ओमकार भोरडे

शिक्रापूर:-विद्यार्थ्यांना सुरक्षित व निर्भय शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी शिक्रापूर पोलिसांनी ‘सुरक्षा संकल्प’ उपक्रम राबवला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली 100 हून अधिक शाळा प्रतिनिधी व मुख्याध्यापकांची संयुक्त बैठक घेऊन शाळा परिसर सुरक्षित करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला.

दि. 24 जून रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्रतिनिधींची उत्साहपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा झाली:
विद्यार्थ्यांची सुरक्षा व विद्यार्थिनींचे संरक्षण – शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनींची छेडछाड, टवाळखोरी किंवा अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचना.
सायबर गुन्हे प्रतिबंध – विद्यार्थ्यांना ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियावरील गैरवापर यापासून सावध राहण्याचे मार्गदर्शन
कायदा व सुव्यवस्था – शाळा परिसरातील संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे लक्ष.
समन्वय – शाळा व पोलीस प्रशासन यांच्यात थेट संपर्क व सहकार्य.
-सीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे
-तक्रार पेटी बसवणे, ज्यात विद्यार्थी तक्रार टाकू शकतील
-गुड टच-बॅड टच विषयावर विद्यार्थिनींना जनजागृती
-संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवणे
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम संदेश पोलीस निरीक्षकांनी दिला. मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करून कोणताही गैरप्रकार झाल्यास पालक, शिक्षक किंवा पोलिसांना लगेच कळवण्याचे आवाहन केले.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी यापूर्वी ज्या ठाण्यांमध्ये काम केले तेथे महिला सुरक्षा जनजागृती, बालसंरक्षण अभियान, छेडछाडविरोधी उपक्रम राबवून संवेदनशील अधिकारी अशी ओळख निर्माण केली आहे. शिक्रापूरमधील हा उपक्रम त्याच सामाजिक बांधिलकीचा भाग आहे.
बैठकीला 100 ते 110 मुख्याध्यापक व शाळा प्रतिनिधी उपस्थित होते. शिक्रापूर पोलिसांच्या या पुढाकाराचे सर्वांनी स्वागत केले आणि पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्यासाठी सुरक्षित शाळा हे पहिले पाऊल, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.







