संतोष पवार

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील डाळज नं. ३ परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याच्या दोन पिल्लांचा सातत्याने वावर दिसून येत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री-अपरात्री शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून, वन विभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डाळज नं. ३ येथील शेतकरी सार्थक जगताप व सौरभ जगताप हे सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ऊस पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी डाळज येथील गट क्रमांक १९४/१९५ मधील शेतात त्यांना साधारण दोन ते अडीच फूट उंचीची बिबट्याची दोन पिल्ले दिसली. अचानक समोर बिबटे दिसताच त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ तेथून पळ काढला आणि घरी येऊन कुटुंबीयांसह ग्रामस्थांना याची माहिती दिली.
विशेष म्हणजे, याच परिसरात दोन दिवसांपूर्वी शंकर जगताप यांनाही हीच दोन बिबट्याची पिल्ले दिसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या भागात बिबट्यांचा सातत्याने वावर असल्याची चर्चा सुरू झाली असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेती कामासाठी आणि ऊस व इतर पिकांना रात्रीच्या वेळी पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेतात जावे लागत आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पिंजरा लावावा, गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.






