पुणे: राज्यात पावसाचा जोर कायम असून 29 जुलै रोजीही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने घाटमाथ्यासह राज्यातील 34 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तर चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्येही हलका ते मध्यम पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता असून या सर्व भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत दिवसभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तसेच नाशिक घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागांसाठी यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मेघगर्जना सुरू असताना शेतात किंवा मोकळ्या जागेत जाणे टाळावे, झाडाखाली उभे राहू नये तसेच आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.






