विशाल कुंजीर
वाघापूर, (पुणे) : उरुळी कांचन-सासवड मार्गावरील वाघापूर (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत रस्त्याच्या मध्योमध्य एक भरधाव पिकअप पलटी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. 09) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील चालक दारूच्या नशेत धुंद होऊन वाहन चालवत असल्याचे समोर आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पिकअप गाडी ही दहिवडी येथीळ असल्याची माहिती मिळत आहे. उरुळी कांचनकडून सासवडच्या दिशेने भरधाव वेगात जात होती. वाघापूर परिसरामध्ये अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या मध्योमध्य पलटी झाली. अपघात एवढा भीषण होता की, गाडीच्या पलटी होण्याने मोठा आवाज झाला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांमध्ये घबराट पसरली.


अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. चालकाला गाडीतून बाहेर काढल्यानंतर तो दारूच्या नशेत पूर्णपणे धुंद असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आले. अपघात घडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या आणि येणाऱ्या नागरिकांनी आणि वाहनधारकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पलटी झालेला पिकअप रस्त्याच्या बाजूला काढण्यात आला असून पुढील वाहतूक कोंडी सोडवण्यात आली.







