पुणे: हवेली तालुक्यातील थेऊर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेले विशेष समाधान शिबिर भर पावसातही उत्साहात पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त आणि महसूल दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती हवेली व अप्पर तहसील कार्यालय हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना थेट उपलब्ध करून देण्यात आला.

कार्यक्रमात आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी हवेली तालुक्यातील काही ठिकाणी नैसर्गिक ओढे आणि नाले बुजविल्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या वस्त्यांमध्ये शिरत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. तसेच नदी प्रदूषणामुळे वाढलेल्या डासांच्या समस्येकडे लक्ष वेधत त्यावर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. शिवरस्ते आणि पानंद रस्त्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल दिन प्रथमच ग्रामीण भागात अभियान स्वरूपात साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. भटके-विमुक्त, आदिवासी आणि वंचित घटकांपर्यंत जातीचे दाखले, विविध प्रमाणपत्रे आणि निवारा योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी महसूल विभाग सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे 1,800 कुटुंबांना घरांचा लाभ देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शिवरस्ते आणि पानंद रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
प्रांताधिकारी यशवंत माने आणि तहसीलदार तृप्ती कोलते यांनी अभियानांतर्गत आतापर्यंत 36 हजार 400 नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आल्याची माहिती दिली. जातीचे दाखले, विविध प्रमाणपत्रे, पानंद रस्त्यांशी संबंधित कामे आणि प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिरात महसूल विभागाच्या सेवा, विविध दाखल्यांचे वितरण, कृषी योजनांची माहिती, महावितरणाशी संबंधित समस्यांचे निराकरण तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. महसूल दिनानिमित्त हवेली तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महसूल अधिकारी, मंडल अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.







