उरुळी कांचन, (पुणे) : “सध्या झपाट्याने होणारे शहरीकरण आणि जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिंग) या संकटांना तोंड देण्यासाठी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरण समतोल राखण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणा पुरेशी नसून, यामध्ये व्यापक लोकसहभाग वाढवण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र वन विभागाचे फॉरेस्ट कॉन्झर्व्हेटर आशिष ठाकरे यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘आनंदवन फौंडेशन’ आणि ‘युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. हडपसर-महंमदवाडी परिसरातील आनंदवन फेज 5 (औतडवाडी हांडेवाडी) आणि न्याती काउंटी येथे शुक्रवारी (ता. 05) सकाळी 7 ते 11 या वेळेत पार पडलेल्या या पर्यावरण पूरक उपक्रमात तब्बल 700 देशी आणि वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ठाकरे बोलत होते.
यावेळी आनंदवन संस्थेचे प्रवीण कुमार आनंद, रमेश नऱ्यानी, भूपेश शर्मा, तसेच युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमचे डॉ. समीर ननावरे, डॉ. मयूर पुस्तके, डॉ. पाटील, डॉ. वाळके, इंडियन डायस्पोराचे रजत कुमार, झेंटिव्हाचे पुरोहित, नोबेल हॉस्पिटलचे मुख्य अधिकारी डॉ. संजय पठारे, हेल्थ केअर असोसिएशनचे धनंजय कणसे, सिद्धू चव्हाण, हृषीकेश शेळके, डॉ. भूषण केदारी, अडसूळ, संघर्ष अकॅडमी (उरळी कांचन) व वेलफेअर असोसिएशनचे संचालक आणि शेकडो पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या मोहिमेत प्रत्यक्ष श्रमदान करून पर्यावरण दिनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
या मोहिमेत विविध नामांकित शाळांतील शेकडो विद्यार्थी, डॉक्टर्स, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक निसर्गप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ घेतली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सध्या जगभरात भेडसावणारी जागतिक तापमान वाढ, सातत्याने वाढणारा उन्हाचा कडाका आणि दुर्मिळ होत चाललेल्या वनौषधींचा ऱ्हास या गंभीर पार्श्वभूमीवर आपले सामाजिक दायित्व म्हणून या समस्येविरोधात लढण्यासाठी या भव्य मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
“या मोहिमे अंतर्गत साधारण 700 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, आमचा उपक्रम केवळ झाडे लावून फोटो काढण्यापुरता मर्यादित नाही, तर पुढील 3 वर्षे या सर्व वृक्षांचे संवर्धन, रक्षण आणि जोपासना शास्त्रीय पद्धतीने केली जाणार आहे,” अशी माहिती युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमचे अध्यक्ष डॉ. विक्रम गायकवाड यांनी दिली. आनंदवन संस्थेचे विशाल पवार यांनी संस्थेच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेत आनंदवन फेज 1 पासून थेट फेज 7 पर्यंत झालेल्या विस्ताराची आणि घनदाट जंगलांच्या निर्मितीची सविस्तर माहिती दिली.
युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या डॉ. सोनल भालेराव यांनी सांगितले की, “संस्था गेली तीन वर्षे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाईच्या पायथ्याशी यशस्वीरीत्या वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करत आहे. याच उपक्रमाचा पुढचा भाग म्हणून यावर्षी पुण्यातील आनंदवन फेज ५ मध्ये ही मोहीम राबवण्यात आली. हा कार्यक्रम केवळ एक शासकीय सोहळा नसून, समाजाच्या हितासाठी चालवला जाणारा एक लोककल्याणकारी कार्यक्रम आहे.”
दरम्यान, या महामोहिमेत दिल्ली पब्लिक स्कूल, अमानोरा स्कूल, रेहान स्कूल, डी.पी.एस. स्कूल आणि ग्रेस स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या उत्साहाने कुदळ-फावडे हातात घेऊन सहभागी झाले होते.






