पुणे: पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल हत्याकांडात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मागील सहा महिन्यांत तब्बल 2 हजार वेळा मोबाईलवरून एकमेकांशी संपर्क साधला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, प्रेमसंबंध, विश्वासघात आणि थंड डोक्याने आखलेल्या कटातून केतन अग्रवालची हत्या करण्यात आल्याचा संशय अधिक बळावला आहे.

पोलिसांच्या चौकशीत आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. दोन्ही आरोपी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आता एकमेकांवरच हत्येचा कट रचल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे चौकशीत अनेक विरोधाभासी माहिती समोर येत असून पोलिसांकडून दोघांची स्वतंत्रपणे कसून चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी “केतनच्या हत्येचा मूळ प्लान कोणाचा होता?” असा प्रश्न विचारल्यानंतर चेतन चौधरीने सिया गोयलचे नाव घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. चौकशीत चेतनने पोलिसांना सांगितले की, तो सियाला वारंवार पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला देत होता. मात्र, सियाचे कुटुंब अत्यंत श्रीमंत असल्याने ते दोघांना कुठेही शोधून काढतील आणि त्यामुळे केतनला संपवणे हाच एकमेव पर्याय असल्याचे सिया सांगत होती, असा दावा चेतनने केला आहे.
दुसरीकडे, सिया गोयलने पोलिसांसमोर पूर्णपणे वेगळी भूमिका मांडली आहे. केतनच्या हत्येचा संपूर्ण प्लान चेतनचाच होता. त्यानेच हा कट रचला होता. याआधी केतनला मारण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर चेतन खूप रडला होता, अशी माहिती सियाने चौकशीत दिल्याचे समोर आले आहे.
दोन्ही आरोपींच्या जबाबांमध्ये मोठा विरोधाभास असल्याने नेमका मास्टरमाइंड कोण, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, उपलब्ध तांत्रिक पुरावे, मोबाईल कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर साक्षींच्या आधारे तपास अधिक वेगाने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, केतन अग्रवालचा खून हा रागाच्या भरात किंवा अचानक झालेला प्रकार नसून, अनेक महिन्यांपासून थंड डोक्याने आखलेल्या नियोजनाचा भाग होता. केतन आणि सिया यांचे लग्न निश्चित झाले होते. दोघांच्या आयुष्याची नवी सुरुवात होणार असतानाच, लोहगड किल्ल्यावर फिरायला नेऊन सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी त्याला सुमारे 600 फूट खोल दरीत ढकलल्याचा आरोप आहे.
सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या केतन अग्रवालचे आयुष्य या कटात संपले. जिच्यासोबत लग्न करून आयुष्याची नवी वाटचाल सुरू करायची होती, त्याच सिया गोयलने तिचा प्रियकर चेतन चौधरीसोबत मिळून त्याचा जीव घेतल्याचा आरोप असून, प्रेम, विश्वास आणि नात्याचा दुर्दैवी शेवट या हत्याकांडातून झाल्याची चर्चा सुरू आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.







