मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई ते नागपूर असा एकाच नियमित प्रवासी विमानातून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मुंबईतील शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघातील सभा आटोपल्यानंतर उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यासाठी रवाना झाले. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते वाशिम आणि यवतमाळ दौऱ्यावर जात असून, यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे चार्टर्ड विमानाऐवजी इंडिगोच्या नियमित विमानाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सोबत आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत आणि खासदार अनिल देसाई हेही उपस्थित होते.

योगायोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील याच इंडिगो विमानाने नागपूरकडे रवाना झाले. विमानात दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांची आस्थेने विचारपूस केली. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी हलक्या-फुलक्या विषयांवर संवाद साधल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी व्हीआयपी प्रोटोकॉलऐवजी नियमित प्रवासी विमानाने प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘इंधन वाचवा’ मोहिमेला प्रतिसाद देत त्यांनी इंडिगोच्या नियमित विमानाने नागपूरला जाणे पसंत केल्याची माहिती समोर आली आहे.






