पुणे: राज्याच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये फूट पडल्यानंतर, आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत संघर्ष वाढताना दिसत आहे. पक्षाच्या भविष्यकालीन वाटचालीबाबत पक्षात सध्या दोन भिन्न विचारप्रवाह दिसून येत आहेत, ज्यामुळे शरद पवार यांच्यासमोरील आव्हाने वाढली आहेत.

पक्षातील एका गटाचे असे मत आहे की, सध्याची कठीण राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षात विलीन व्हावे. याउलट, दुसऱ्या गटाची भूमिका पूर्णपणे वेगळी असून, त्यांनी सत्तेसाठी एनडीए (NDA) आघाडीमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या गटाच्या मते, केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहिल्यास मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळवणे अधिक सोपे होईल. दिवंगत अजित पवार यांची भूमिकाही दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यानंतर एनडीएसोबत राहण्याचीच होती, असा संदर्भ देत हे नेते आपली मागणी लावून धरत आहेत.

विरोधी पक्षात राहिल्यामुळे आपल्याला मतदारसंघातील कामे करताना अडचणी येत आहेत, अशी भावना अनेक आमदार आणि स्थानिक नेत्यांची झाली आहे. त्यामुळे सत्तेत जाण्यासाठी पक्षातील काही आमदार कमालीचे आसुसलेले दिसत आहेत. आगामी काळात शरद पवार यापैकी कोणत्या गटाची बाजू घेतात किंवा ते आपल्या मूळ विरोधी भूमिकेवर ठाम राहतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







