राजगड: राजगड किल्ल्याच्या दिशेने ट्रेकिंगसाठी निघालेल्या तरुणांच्या एका खाजगी मिनीबसचा पाबे घाटात भीषण अपघात झाला. रविवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली, ज्यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मरण पावलेल्यांमध्ये मुंबईच्या विलेपार्ले (नेहरुनगर) येथील २५ वर्षीय विश्वास सातिम या तरुणाचा समावेश आहे. या अपघातामुळे सातिम कुटुंब आणि मित्रपरिवारात मोठी शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मुंबईतून हे तरुण ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी मिनीबसने निघाले होते. पाबे घाटातील एका धोकादायक आणि तीव्र वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. बस संरक्षक कठडा तोडून सुमारे ४० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत विश्वास सातिमसह इतर २ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य राबवून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

मूळचा रायगड जिल्ह्यातील संदेरी गावचा असलेला विश्वास हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा होता. आईला सांगितले कि, “रविवारी दुपारी फोन करेन आणि घरी जेवायला येणार की नाही ते सांगेन.” मात्र, त्याच्या आईला दुपारी फोन येण्याऐवजी पहाटे ३.३० वाजता त्याच्या मित्राचा फोन आला आणि विश्वास जखमी असल्याची माहिती मिळाली. सकाळी ८ वाजता त्याच्या निधनाची दुःखद बातमी घरच्यांना समजली. ट्रेकिंगसाठी उत्साहाने गेलेल्या एका तरुणाचा असा अकाली अंत झाल्याने सर्वांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.







