अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चोराची वाडी गावात एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या भावांनी सुखी संसाराची स्वप्ने पाहिली होती, पण लग्नानंतर अवघ्या ५ दिवसांतच त्यांच्या आयुष्यातील आनंद हिरावून घेण्यात आला. एका भामट्या एजंट आणि दोन तरुणींनी मिळून या भावांना ५ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

ही फसवणूक नांदेडमधील एका लग्न जुळवणाऱ्या एजंटच्या मदतीने झाली. छत्तीसगड येथील दोन तरुणींशी या भावांचे लग्न ठरवण्यात आले होते. या विवाहासाठी ५ लाख रुपये देण्याचे ठरले. पीडित कुटुंबाने ठरल्याप्रमाणे १ लाख रुपये ऑनलाईन दिले आणि २३ मे रोजी लग्न पार पडल्यानंतर उरलेले ४ लाख रुपये एजंटला रोख स्वरूपात दिले. लग्नाचे सुरुवातीचे ४ दिवस आनंदाचे गेले, परंतु पाचव्या दिवशी या नववधूंनी मोठा कट रचला.

दोन्ही नववधूंनी रात्री त्यांनी जेवणात गुंगीचे औषध मिसळून संपूर्ण कुटुंबाला जेवण वाढले. जेवण केल्यानंतर सर्वजण गाढ झोपेत असताना या दोन्ही नववधूंनी घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला. सकाळी उठल्यावर घरात सुना नसल्याचे पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पीडित कुटुंबाचा असा आरोप आहे की, पोलीस ठाण्यात अनेक वेळा हेलपाटे मारूनही पोलिसांनी अजून गुन्हा नोंदवलेला नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.







