पुणे : जेजुरीजवळील वारकऱ्यांच्या दिंडीत ट्रक घुसल्याच्या घटनेनंतर आठवडाही उलटलेला नसताना पुणे जिल्ह्यात आणखी एक दुर्दैवी अपघात घडला आहे. बारामतीजवळ मध्यरात्री भरधाव कारने एका वारकऱ्याला जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मृत वारकऱ्याचे नाव विष्णू रामचंद्र पवार (वय ६७) असे आहे. ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे वारी करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री ते इतर वारकऱ्यांसोबत प्रवास करत असताना भरधाव वेगाने आलेल्या एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, विष्णू पवार गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर कारचालक घटनास्थळावर न थांबता फरार झाला. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिक आणि इतर वारकऱ्यांनी तत्काळ मदत करत जखमी पवार यांना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच बारामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहनाचा आणि फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण आणि चालकाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत वारकऱ्यांच्या दिंडीशी संबंधित अपघातांच्या घटना वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जेजुरी परिसरातील अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बारामतीतील ही घटना घडल्याने वारी मार्गावरील सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.







