पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.काही वेळापूर्वीच त्यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यानंतर ते लगेचच दिल्लीकडे रवाना झाले. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे दिल्लीतील घडामोडींना आता वेग आला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’च्या यशानंतरचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, या 6 पैकी 2 बंडखोर खासदारांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. याशिवाय, श्रीकांत शिंदे यांच्या गळ्यातही केंद्रीय मंत्रीपदाची माळ पडू शकते, असे बोलले जात आहे. या दौऱ्यात शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून मंत्रीपदाच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत. ज्या मंत्र्यांची कामगिरी चांगली राहिलेली नाही, त्यांना पदावरून हटवले जाण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतही एक मोठी चर्चा रंगत आहे. देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार असून एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणार असल्याच्या अफवा आहेत, मात्र भाजप नेत्यांनी अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
धक्कादायक बाब म्हणजे, आम आदमी पक्षातून मोठी बंडखोरी केलेले राघव चड्ढा यांनाही या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.







