पुणे : पुण्यातील बहुचर्चित ‘ केतन’ हत्या प्रकरणाला आता एक नवीन आणि भावनिक वळण मिळाले आहे. या प्रकरणात बळी पडलेल्या केतन अग्रवालच्या आईने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक अत्यंत भावुक पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. या पत्रामुळे सोशल मीडियासह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पत्रात आपल्या भावना व्यक्त करताना केतनच्या आईने लिहिले आहे की,”इतर सामान्य मातांप्रमाणेच मीसुद्धा माझ्या मुलाच्या सुखी आयुष्याची, त्याच्या लग्नाची आणि आमच्या म्हातारपणाच्या आधाराची सुंदर स्वप्ने पाहिली होती. पण, मला माझ्याच हाताने माझ्या तरुण मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करावे लागले, यापेक्षा मोठे दुःख काय असू शकते? माझ्या मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि त्यासोबतच आमचे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाले.”

घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, केतनच्या खोलीत आणि कपड्यांमध्ये त्याचीच आठवण येत असल्याचे सांगत त्यांनी, जोपर्यंत केतनला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

नेमकी घटना काय होती?
पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल हा काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्यानंतर तपासात समोर आले की, लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरून तब्बल 400 फूट खोल दरीत ढकलून केतनची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही भयानक घटना 18 जून रोजी घडली होती.
या हत्येचा कट इतर कोणी नसून केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच रचला होता. केतन आणि सिया यांचा साखरपुडा झाला होता आणि लवकरच त्यांचे लग्न होणार होते. मात्र, सियाचे चेतन चौधरी नावाच्या दुसऱ्या एका तरुणावर प्रेम होते. याच प्रेमाच्या त्रिकोणातून आणि वादातून सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केतनचा काटा काढण्याचा कट रचला. त्यांनी फिरण्याच्या बहाण्याने केतनला लोहगडावर नेले आणि तिथून त्याला दरीत ढकलून दिले.
या धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरवून सोडले होते. आता थेट पंतप्रधानांकडे या प्रकरणात न्यायाची याचना केल्यामुळे पोलीस तपासाला आणि या खटल्याला अधिक वेग येण्याची शक्यता आहे.,







