कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये सासरच्या छळाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अस्मिता प्रतीकसिंह काटकर (२९) या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे अवघ्या १ महिन्याच्या चिमुकल्या बालिकेचे मातृछत्र हरपले असून, कोल्हापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

अस्मिताचे पती प्रतीकसिंह, सासू मनीषा, सासरा वीरेंद्रसिंह आणि नणंद ऋतुजा या चौघांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अस्मिताच्या माहेरच्यांच्या आरोपानुसार, लग्नापासूनच सासरची मंडळी तिच्यावर अमानवीय निर्बंध लादत होती. लग्नात डान्स न केल्याच्या क्षुल्लक कारणावरून तिला सतत टोमणे मारले जात होते. त्यानंतर, तिला मुलगा होईल अशी सासरच्यांना अपेक्षा होती, मात्र मुलगी झाल्यामुळे तिला मानसिक छळाला सामोरे जावे लागत होते.

अस्मितावर तिच्या सासरच्या मंडळींकडून अमानवीय निर्बंध लादले जात होते. साडीचा पदर नेहमी डोक्यावरून घ्यावा, घराबाहेरच्या व्यक्तींशी बोलताना मान वर करून बोलू नये, सासूला ‘माँसाहेब’ तर सासऱ्याला ‘आबासाहेब’ अशीच हाक मारावी, नवऱ्याला ‘सरकार’ आणि नणंदेला ‘राणीसाहेब’ संबोधले पाहिजे, असे जाचक नियम तिच्यावर लादले होते.
अस्मिताच्या कुटुंबाने लग्नापासून ते बाळंतपणापर्यंत तब्बल २५ लाख रुपये खर्च केले होते. यात ९ तोळे सोने, ५ लाखांचा संसारसेट, डोहाळे जेवण आणि प्रसूतीचा खर्च यांचा समावेश आहे. एवढा खर्च करूनही सासरच्यांची पैशांची मागणी थांबत नव्हती. मुलीच्या बारशाच्या कार्यक्रमावरूनही सासरच्यांनी तणाव निर्माण केला होता, ज्यामुळे अस्मिता प्रचंड मानसिक तणावात होती.
मूळची आजरा तालुक्यातील लाटगाव येथील असलेली अस्मिता अत्यंत हुशार होती. तिने बी. कॉमपर्यंत शिक्षण पूर्ण करून एअर इंडियात नोकरीही केली होती. संसाराला प्राधान्य देण्यासाठी तिने आपली नोकरी सोडली, मात्र त्याच सासरच्या छळाने तिला मृत्यूला कवटाळण्यास भाग पाडले. सधन कुटुंबातील असूनही जुनाट विचारसरणी आणि पैशांच्या हव्यासापोटी एका सुशिक्षित तरुणीचा बळी गेला आहे. सध्या त्या १ महिन्याच्या चिमुकलीची जबाबदारी चुलत आजीवर येऊन पडली आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरत आहे.







