पुणे : केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर माध्यमांसमोर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. मुलीने गुन्हा केला असेल तर तिला कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मात्र या प्रकरणात संपूर्ण कुटुंबालाच लक्ष्य केले जात असल्याची खंत व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले.

सिया गोयलच्या वडिलांनी सांगितले की, १४ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी त्यांच्या मार्केट यार्ड येथील मसाल्याच्या दुकानात आले. त्यांनी चार नमुने तपासणीसाठी घेतले असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुकानाच्या परवान्याबाबत नव्याने अर्ज केला असून तो आठ ते दहा दिवसांत मिळण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत दुकान बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याचे पालन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी दुकान सील करण्यात आलेले नसल्याचेही स्पष्ट केले. तसेच, “माझ्याविरोधात कोणीतरी षडयंत्र रचत आहे असे मला वाटते. मात्र त्यामागे कोण आहे, याची मला कल्पना नाही,” असेही त्यांनी म्हटले.

मुलीबाबत बोलताना ते म्हणाले, “माझ्या मुलीने काही चुकीचे केले असेल तर तिला कठोर शिक्षा व्हायलाच हवी. मी न्यायव्यवस्था आणि कायद्याच्या बाजूने आहे. तपासात पूर्ण सहकार्य करेन. पण वारंवार माझ्या कुटुंबालाच लक्ष्य केले जात आहे.”
यापुढे बोलताना त्यांना भावना आवरता आल्या नाहीत. “मुलीला शिक्षा झाली तरी मला हरकत नाही, पण त्यासाठी संपूर्ण कुटुंबाला शिक्षा मिळत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला विनाकारण त्रास देऊ नका. या सगळ्या प्रकारामुळे मी अनेक दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली आहे,” असे सांगताना सिया गोयल यांच्या वडिलांच्या डोळ्यांत अश्रू आले.







