पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधानंतर, संगणक आधारित परीक्षा (CBT) प्रणाली सध्या तातडीने लागू न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. ही नवीन ऑनलाईन प्रणाली ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तोपर्यंत एमपीएससीच्या सर्व परीक्षा सध्याच्या जुन्या आणि प्रचलित (ऑफलाईन) पद्धतीनेच घेतल्या जातील.

एमपीएससी परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयाला राज्यभरातील उमेदवारांनी जोरदार विरोध केला होता. परीक्षा ऑफलाईनच व्हाव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर आमदार अभिमन्यू पवार यांच्या मध्यस्थीने विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार, राज्याचे मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली.

या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शासकीय भरतीची प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र, कोणतीही नवीन परीक्षा पद्धती आणताना प्रशासकीय यंत्रणा आणि विद्यार्थी दोघांनाही तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे ही पद्धत थेट लागू न करता 2027 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, याविषयीचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडेच असेल.

या निर्णयावर बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, जवळपास 90 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची इच्छा ऑफलाईन परीक्षेचीच होती. सरकारने विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर केला असून यामुळे लाखो तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. भविष्यात ऑनलाईन परीक्षेसाठी आवश्यक ती यंत्रणा उभारली जाईल आणि टप्प्याटप्प्याने बदल केले जातील. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी कोणत्याही दडपणाशिवाय आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.







