नसरापूर प्रतिनिधी विशाल शिंदे

भोर: भोर तालुक्यातील नसरापूर गावाला पुन्हा एकदा कचऱ्याच्या गंभीर समस्येचा सामना करावा लागत असून शिवगंगा नदीच्या पुलाखाली साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नदीपात्रात टाकण्यात आलेला कचरा वाहून पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे भविष्यात रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थ, व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

नसरापूरमधून वाहणारी शिवगंगा नदी बनेश्वर देवस्थानाच्या दिशेने पुढे जाते. या नदीवरील पुलाखाली सध्या कोंबड्यांचे अवशेष, चिकन व्यवसायातील टाकाऊ पदार्थ, विविध खाद्यपदार्थांचा कचरा तसेच इतर घनकचरा मोठ्या प्रमाणावर साचलेला आहे. या कचऱ्यामुळे परिसरात इतकी दुर्गंधी निर्माण झाली आहे की पुलावरून जाणाऱ्या नागरिकांना नाकावर रुमाल धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक नागरिकांनी या परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते अतुल चाळेकर यांनी सांगितले की, पावसाळा सुरू झाल्यानंतर हा कचरा वाहून खडकी परिसरातील नसरापूरच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीजवळ जाऊ शकतो. दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे साथीचे आजार व इतर रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित व्यक्ती कचरा टाकत असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, तसेच कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी आपले काम योग्य पद्धतीने न केल्यास नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
नसरापूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य हाडके यांनी घंटागाडी सेवेबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, गावातील चिकन विक्रेते, डेअरी व्यावसायिक, बेकरी चालक, भाजी विक्रेते व इतर व्यापाऱ्यांचा कचरा नियमितपणे उचलला जात नाही. काही वेळा घंटागाडी येते तर काही दिवस येतच नाही. त्यामुळे वाढणारा कचरा काही व्यावसायिकांकडून नदीपात्रात किंवा इतर मोकळ्या जागांमध्ये टाकला जात असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतीने या समस्येची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा व्यापारी संघटना आणि ग्रामस्थ आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी दिला.
व्यापारी असोसिएशनचे सचिव प्रवीण ठोंबरे यांनी स्वतः शिवगंगा पुलाखाली जाऊन पाहणी केली. त्यांनी सांगितले की, नदीपात्रात चिकन दुकानांचा कचरा, खाद्यपदार्थांचे अवशेष आणि इतर सेंद्रिय कचरा मोठ्या प्रमाणावर साचलेला आहे. या कचऱ्यामुळे केवळ दुर्गंधीच नव्हे तर पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून हा कचरा हटवावा, अशी त्यांनी मागणी केली.
स्थानिक नागरिक ज्ञानेश्वर झोरे यांनीही कचरा संकलन सेवेतील अनियमिततेकडे लक्ष वेधले. काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेली कचरा संकलन व्यवस्था सुरुवातीला समाधानकारक होती. मात्र अलीकडे वाहन नियमित येत नसल्याने पुन्हा कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यावसायिकांनीही जबाबदारीने वागून कचरा नदीपात्रात न टाकण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, ग्रामस्थांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या एका जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वी नसरापूरहून माळेगाव येथील सभेला जात असताना त्यांनी पुलावरील कचरा पाहून नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी “अरेरे, काय तो नसरापूर पुलावरील कचरा… या ठिकाणची सत्ता माझ्या हातात द्या, हा प्रश्न सोडवून दाखवतो,” असे त्यांनी म्हटल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे आजही नागरिक त्या आश्वासनाची आठवण करून देत प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
ग्रामस्थांनी चेलाडी येथील उपलब्ध जागेवर कायमस्वरूपी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित प्रशासनाने संयुक्तपणे कार्यवाही करून शिवगंगा नदीपात्रातील कचरा तातडीने हटवावा आणि नसरापूरला स्वच्छ, सुंदर व रोगराईमुक्त गाव बनवावे, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.







