पुणे: मुंबई ते पुणे दरम्यान सतत वाढणारी वाहतूक कोंडी आणि औद्योगिक भागांतील ट्रॅफिकचा (Mumbai Pune New Highway) ताण लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिरूरसाठी स्वतंत्र आणि पर्यायी (Shirur) महामार्ग उभारण्याला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली असून यामुळे जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील दबाव कमी होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाची माहिती शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली. (Latest Marathi News)
प्रस्तावित महामार्ग उरण-कर्जत-नेरळ-वांद्रे-पाईट-शिरोली-पाबळ-मलठण-शिरूर असा असणार आहे. अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक, उद्योग क्षेत्र आणि प्रवाशांकडून या मार्गाची मागणी केली जात होती. अखेर मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने ‘नेरळ-कर्जत-वांद्रे-पाईट-मलठण-शिरूर’ या पर्यायी मार्गाला हिरवा कंदील दिला आहे.

या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पुणे ते शिरूर दरम्यान सुमारे 53 किमी लांबीचा 10-पदरी मल्टी-लेयर उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. हा देशातील सर्वात मोठ्या उन्नत मार्गांपैकी एक मानला जात आहे. विशेष म्हणजे हा महामार्ग थेट जेएनपीटी बंदराशी जोडला जाणार असल्याने औद्योगिक आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी ही मोठी संधी ठरणार आहे.
सध्या चाकण, तळेगाव आणि शिक्रापूर या एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. ट्रक, कंटेनर आणि प्रवासी वाहनांचा ताण एकाच मार्गावर असल्याने वेळ आणि इंधनाचा मोठा अपव्यय होतो. नवीन मार्गामुळे हा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.
या प्रकल्पामुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर शिरूर आणि आसपासच्या भागातील उद्योग, व्यापार आणि रोजगारालाही चालना मिळणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि जेएनपीटी बंदर यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारल्याने संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे.







