न्हावरे: रांजणगाव गणपती, कारेगाव, शिक्रापूर, सणसवाडी आणि करडे परिसरात एमआयडीसी उभारल्यानंतर शिरूर तालुक्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळाली. हजारो युवकांना रोजगार मिळाला, अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारली, महागड्या गाड्या, आधुनिक घरे, मोबाईल आणि चैनीच्या वस्तू सहज उपलब्ध झाल्या. एकूणच या परिसरातील राहणीमान व आर्थिक परिस्थिती उंचावल्याचे चित्र आहे.

मात्र,या आर्थिक प्रगतीसोबतच वाढत्या गुन्हेगारीमुळे सामाजिक मूल्यांची घसरण होत असल्याची चिंताही व्यक्त केली जात आहे. एकमेकांविषयीचा आदर, प्रेम, आपुलकी, सामाजिक बांधिलकी आणि संस्कार यांची जागा हळूहळू अहंकार, स्पर्धा आणि पैशाच्या हव्यासाने घेतल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे.

एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये ठेके मिळवण्यासाठी वाढलेली स्पर्धा काही ठिकाणी संघर्षात बदलली. या संघर्षातून स्थानिक पातळीवर भाईगिरी, दहशत आणि गुन्हेगारीला खतपाणी मिळाल्याचे जाणकारांचे मत आहे. विशेषतः १८ ते २० वर्षे वयोगटातील काही युवक झटपट पैसा,मोठेपणा आणि वर्चस्वाच्या मोहात गुन्हेगारीच्या मार्गाकडे वळत असल्याची बाब चिंताजनक आहे.
हातात गावठी कट्टे, रिव्हॉल्व्हर यांसारखी शस्त्रे बाळगणे, किरकोळ कारणांवरून जीवघेणे हल्ले करणे, तसेच अवैध मार्गाने कमावलेला पैसा महागडे व्यसन (एमडी), मद्यपान आणि इतर गैरप्रकारांवर उधळला जात असल्याच्या घटनांमुळे समाजमन अस्वस्थ झाले आहे. या चुकीच्या प्रवृत्तीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून,काही घरांमध्ये तर आयुष्यभर न भरून येणाऱ्या जखमा निर्माण झाल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्ते आणि जागरूक नागरिकांच्या मते, आर्थिक विकासाबरोबर नैतिक मूल्ये,संस्कार आणि सामाजिक जबाबदारी जोपासली गेली नाही, तर विकासाचा खरा हेतूच हरवतो. त्यामुळे शिरूर तालुक्यात एमआयडीसीमुळे आलेली सुबत्ता ही समाजाच्या सर्वांगीण विकासाची खूण आहे की, सामाजिक अधःपतनाची सुरुवात, असा प्रश्न आज अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
याचबरोबर एमआयडीसी परिसरात ठेक्यांच्या स्पर्धेतून वाढणाऱ्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.कायद्याचा धाक निर्माण करून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करणे ही यंत्रणांची जबाबदारी आहे.समाजात शांतता,सुरक्षितता आणि सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी प्रशासन ,पोलीस, उद्योग क्षेत्र, पालक आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज आज पूर्वीपेक्षा अधिक तीव्रतेने जाणवत आहे.
आर्थिक विकासाला सामाजिक मूल्यांची जोड मिळाली, तरच एमआयडीसीची सुबत्ता खऱ्या अर्थाने जनतेच्या कल्याणाची ठरेल. अन्यथा पैशाच्या मोहातून वाढणारी गुन्हेगारी ही भविष्यातील पिढ्यांसाठी मोठे संकट ठरू शकते.
शिरूर तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत एप्रिल-2026 मध्ये 9 दिवस आंदोलन झाले होते. त्यावेळी पोलिस अधिक्षकांनी दिलेली कोणतीही आश्वासने पाळली गेलेली नाहीत किंवा त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे तालुक्यात सर्वच बाबतीत गुन्हेगारी वाढली आहे. तसेच वाढत्या गुन्हेगारीला पोलिसच जबाबदार आहेत.
– निलेश वाळुंज (सामाजिक कार्यकर्ता)तालुक्यातील सर्व प्रकारच्या गुन्हेगारांची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार असून, गुन्हेगारांना शिरूर पोलिस स्टेशनमध्ये हजेरीसाठी वेळोवेळी बोलावले जाईल. तसेच गुन्हेगारांची दैनंदिन दिनचर्या बाबत माहिती काढून गुन्हेगारीला कशाप्रकारे आळा घालता येईल.यासाठी प्रयत्न केले जातील.
-विनोद पाटील(पोलीस निरीक्षक, शिरूर)







