न्हावरे: शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी (फलके मळा) येथे बुधवारी (२२ जुलै) मध्यरात्री सुमारे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घरालगतच्या गोठ्यात आई-वडिलांसोबत झोपलेल्या पाच वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून तिला उचलून नेल्याची हृदयद्रावक घटना घडली.या हल्ल्यात भाग्यश्री संदीप वारे (वय ५, मूळ रा. पाथर्डी, जि.अहिल्यानगर) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेमुळे पिंपळसूटीसह संपूर्ण शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वारे कुटुंब पिंपळसूटी येथील मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या शेतावर मजुरीचे काम करत असून ते रात्री गोठ्यात झोपले होते.पहाटेच्या सुमारास भाग्यश्रीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिचे आई-वडील जागे झाले.त्यावेळी बिबट्या तिला फरफटत उसाच्या शेताकडे घेऊन जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यांनी आरडाओरडा केला. मात्र बिबट्या चिमुकलीला घेऊन अंधारात पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.घरापासून सुमारे ५० मीटर अंतरावरील उसाच्या शेतात भाग्यश्रीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
पिंपळसूटी परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत. पशुधनांवरील हल्ल्यांसह मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.यापूर्वीही याच परिसरात रक्षा अजय निकम(वय ४)या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.पुन्हा अशाच प्रकारे एका निष्पाप बालिकेचा बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
या भागात तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे,व्यापक सर्च ऑपरेशन राबवावे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात,अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी वन विभाग आणि शासनाकडे केली आहे.







