नवी दिल्ली: नवी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या वतीने सुरू असलेला तीव्र निषेध मोर्चा दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत चालला आहे. नीट (NEET) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या निषेधार्थ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला देशभरातून विरोधी पक्षांचा जोरदार पाठिंबा मिळत असून, मंगळवारी राहुल गांधी, अखिलेश यादव, प्रियंका गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांसारख्या दिग्गज राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष जंतरमंतरवर उपस्थिती लावून आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या आंदोलनाला बळ देण्यासाठी महाराष्ट्रातील नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट दिल्लीच्या जंतरमंतरवर हजेरी लावत अभिजीत दीपके यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मनोज जरांगे यांनी सरकारला थेट शब्दांत इशारा दिला आहे. “शांततापूर्ण आंदोलनात प्रचंड ताकद असते, हे आपण दाखवून दिले आहे. या देशातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आणि देश खंबीरपणे उभा आहे. जर या आंदोलकांवर यापुढे कोणताही अन्याय वा हल्ला झाला, तर गप्प बसणार नाही; वेळ पडल्यास संपूर्ण मराठा समाज दिल्लीत दाखल होईल,” असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आपणच या नेत्यांना निवडून दिले असून, जर त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. तसेच, विद्यार्थ्यांनी कोणत्याही भडकावण्याला बळी न पडता आपले आंदोलन अत्यंत शांततापूर्ण मार्गाने सुरू ठेवावे आणि संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. सरकारकडून हे आंदोलन दडपून टाकण्याचे प्रयत्न होऊ शकतात, मात्र संयमाने लढा दिल्यास नक्की न्याय मिळेले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






