पुणे : राजधानी दिल्लीत NEET पेपरफुटी प्रकरण, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांनी शंभू बॉर्डरच्या दिशेने कूच केली असून, जंतर-मंतरवरही मोठे आंदोलन सुरू आहे. नुकत्याच झालेल्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.सुरक्षेचा उपाय म्हणून आता सीआरपीएफच्या 20 तुकड्या विमानाने पश्चिम बंगालमधून तातडीने दिल्लीत बोलावण्यात आल्या आहेत.

विरोधकांनी या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे.तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी थेट पंतप्रधान निवासाबाहेर ठिय्या आंदोलन केले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी दिल्लीत 16 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत.

वाढता तणाव, पोलिसांवर झालेले हल्ले आणि संसदेचे सुरू असलेले पावसाळी अधिवेशन लक्षात घेता, गृह मंत्रालयाने सुरक्षेसाठी अत्यंत मोठे पाऊल उचलले आहे.सीआरपीएफच्या 20 तुकड्या पश्चिम बंगालमधून तातडीने दिल्लीत बोलावण्यात आल्या आहेत. आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता असल्याने संपूर्ण दिल्लीला सध्या छावणीचे स्वरूप आले असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
एका कंपनीत सुमारे 100 जवान असतात. त्यामुळे कोलकाता येथून जवळपास 2000 अतिरिक्त जवान दिल्लीत दाखल होत आहेत. दिल्ली पोलिसांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने आधीच सीआरपीएफ आणि दंगल नियंत्रण पथकाच्या (RAF) 30 कंपन्या तैनात केल्या आहेत.






