मुंबई: भारतीय क्रिकेट संघासाठी ३ ऑक्टोबर हा दिवस विशेष ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी भारतीय संघाला दोन वेगवेगळ्या देशांमध्ये सामने खेळावे लागू शकतात. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेटमधील सुवर्णपदकाच्या सामन्यासाठी भारत पात्र ठरल्यास, त्याच दिवशी वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना देखील खेळावा लागणार आहे.

३ ऑक्टोबर रोजी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना मुल्लानपूर, न्यू चंदीगड येथे होणार आहे. त्याच दिवशी २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेटच्या सुवर्णपदकाचा सामना जपानमधील निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये होणार आहे. भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत थेट उपांत्यपूर्व फेरीपासून खेळणार आहे. त्यामुळे भारताने अंतिम फेरी गाठल्यास ३ ऑक्टोबरला दोन वेगवेगळ्या देशांत सामने खेळण्याची वेळ येऊ शकते.

सप्टेंबरमध्येही भारतीय संघाचा व्यस्त कार्यक्रम आहे. या महिन्यात भारत एकूण सहा मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहे. १३ सप्टेंबरपासून दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामने सप्टेंबरमध्ये खेळले जाणार आहेत. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचा उपांत्यपूर्व सामनाही याच काळात होणार आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. श्रेयस अय्यरकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि वैभव सूर्यवंशी यांचा संघात समावेश आहे. हे खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार असल्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा भाग नसतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये यापूर्वीही असाच योगायोग घडला आहे. १२ सप्टेंबर १९९८ रोजी भारतीय संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सामना खेळला होता. त्याच दिवशी सहारा कपमध्ये पाकिस्तानविरुद्धही भारताचा सामना झाला होता. विशेष म्हणजे भारताने हे दोन्ही सामने जिंकले होते. आता तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय संघाच्या बाबतीत अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.







