मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमध्ये कथित पेपरफुटी आणि कारभारावरून राज्यातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. पुण्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आक्रोश मोर्चा काढला. या पार्श्वभूमीवर MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी निवेदनाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्यावर होत असलेले आरोप तथ्यहीन असून वैयक्तिक पातळीवर प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझ्याविरोधात एकही ठोस पुरावा समोर आल्यास पदावर राहणार नाही, असेही भीमनवार यांनी स्पष्ट केले.

औषध निरीक्षक गट-ब परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितले की, ही घटना आपण आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी घडली होती. तक्रार मिळाल्यानंतर आयोगाने पोलिसांकडे तातडीने तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आयोगाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. राज्य सरकारनेही स्वतंत्र उच्चाधिकार समिती स्थापन केली असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी चर्चा केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या कार्यकाळातील कामकाजाची माहिती देताना भीमनवार यांनी विविध सुधारणा करण्यात आल्याचा दावा केला. आतापर्यंत स्पर्धा परीक्षा आणि सरळसेवा भरतीच्या मिळून 84 चाळणी परीक्षा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निकाल जाहीर होण्यासाठी लागणारा कालावधी कमी करून 18 ते 21 दिवसांपर्यंत आणण्यात यश आल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात सर्व परीक्षांचे निकाल एका महिन्यात जाहीर करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पुण्यात विद्यार्थ्यांनी ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढला. परीक्षा रद्द झाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी MPSC अध्यक्ष आणि सचिवांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि विश्वजीत कदम आंदोलनात सहभागी झाले. आदित्य ठाकरे आणि अभिजीत दिपके यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे यात राजकारण नसल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.






