पुणे: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे अनेक भागांतील पिकांवर परिणाम झाला असून काही ठिकाणी पिके सुकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच हवामान विभागाने 8 सप्टेंबर रोजी राज्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, या जिल्ह्यांसाठी कोणताही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या घाटमाथ्यावरदेखील मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मात्र, काही भागांत पावसाऐवजी उष्णतेचा त्रास वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागांसाठीही कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
दरम्यान, विदर्भात 8 सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज नाही. काही भागांत तापमान वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो.






