दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत राजकीय चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीची काही छायाचित्रे समोर आली असून, त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांचे स्वागत करत त्यांना आपल्या दालनात नेल्याचे दिसत आहे.

या भेटीची वेळही महत्त्वाची मानली जात आहे. सध्या दिल्लीतील जंतरमंतर येथे NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर केंद्र सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. अशा पार्श्वभूमीवर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काही चर्चा झाली का, याबाबतही उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी एक दिवस आधी जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन त्यांना पाठिंबा दर्शवला होता. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मार्ग काढण्यासाठी त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली असावी. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या भेटीत शरद पवार यांनी महाराष्ट्रातील शेती आणि पाणी व्यवस्थेशी संबंधित विविध प्रश्नांबाबत पंतप्रधानांना निवेदन दिले. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे, बाधित कुटुंबांना आर्थिक मदत देणे, रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करणे आणि शेतकऱ्यांना MSP चा कायदेशीर लाभ मिळावा, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
याशिवाय पीक विमा योजनेतील त्रुटी दूर कराव्यात, निकृष्ट बियाणांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि कृषी क्षेत्रासाठी अधिक प्रभावी धोरणे राबवावीत, अशीही मागणी करण्यात आली. या भेटीमुळे पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






