पुणे : चाकण आणि तळेगाव औद्योगिक परिसरातील रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडी, पार्किंग आणि भूसंपादनाच्या प्रश्नांवर सरकारने ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 10 महिन्यांत उद्योजकांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण येथे केली.

उद्योजक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय वाढवण्यासाठी दर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘उद्योग दरबार’ आयोजित केला जाणार आहे. तसेच उद्योगमंत्री दर 2 महिन्यांनी जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरातील समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.

चाकणमधून 20 मोठे उद्योग बाहेर जाणार असल्याच्या चर्चेवरही सामंत यांनी स्पष्टीकरण दिले. चाकणमधील उद्योग स्थलांतराबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. उलट, गेल्या 3 ते 4 वर्षांत परिसरातील उद्योगांमध्ये दरवर्षी सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे उद्योजकांनी सांगितल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, चाकण-तळेगाव-शिक्रापूर औद्योगिक पट्ट्यातील रस्ते, वाहतूक, कचरा, प्रदूषण, पाणी आणि वीज यांसारख्या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा झाली. महिंद्रा कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी भूसंपादनात अडथळा ठरणाऱ्या 4 शेतकऱ्यांबाबत सक्तीच्या भूसंपादनाचा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही औद्योगिक परिसरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश दिले. पावसाळ्यात पारंपरिक पद्धतीने रस्ते दुरुस्त करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता प्री-कास्ट आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅचसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चाकण, रांजणगाव आणि तळेगाव परिसरातील रस्त्यांसाठी गेल्या वर्षभरात 410 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित 14 किलोमीटर रस्त्यांच्या कामांचे नियोजनही करण्यात येणार आहे. याशिवाय कामगारांसाठी ‘क्लस्टर हाउसिंग’ उभारण्यासाठी एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करून देण्याचे धोरण राबवले जाणार आहे.







