उरुळी कांचन, ता. 17 : येथील फक्त मुलींची प्रसिद्ध इंग्रजी माध्यमाची शाळा असलेल्या उन्नती कन्या विद्यालय येथे 80 वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.

शनिवारी (ता. 15) आयोजित या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून ‘ग्रीन पिरॅमिड बायोटेक प्रा. लि.’च्या संचालिका व सह-संस्थापक अस्मिता प्रभुणे उपस्थित होत्या. त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यंदाचा स्वातंत्र्य दिन ‘विकसित भारत’ या विशेष संकल्पनेवर आधारित होता. ध्वजारोहणानंतर विद्यार्थिनींनी दिमाखदार मार्चपास्ट व परेड सादर केली. यानंतर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या कराटे आणि धनुर्विद्येच्या साहसी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.

कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनेच्या नृत्याने झाली. त्यानंतर विद्यार्थिनींनी 1857 ते 1947 या काळातील देशवीरांच्या बलिदानाची झलक नृत्यातून आणि प्रभावी भाषणांतून मांडली. या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्र साक्षर करण्यासाठी उपस्थितांकडून साक्षरता शपथ घेण्यात आली. प्रमुख पाहुण्या अस्मिता प्रभुणे यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन करताना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश दिला.

शाळेच्या संचालिका डॉ. नुपूर सुरेश कांचन आणि मुख्याध्यापिका पद्मादेवी विडप यांनीही विद्यार्थिनींना उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या सोहळ्यासाठी शाळेच्या अध्यक्षा नयॉन सुरेश कांचन, पालकांचा मोठा वर्ग आणि नागरिक उपस्थित होते. पालकांच्या उपस्थितीने विद्यार्थिनींचा उत्साह द्विगुणित झाला.
दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका पल्लवी काटदरे व विद्यार्थिनी तेजल बिरंगळ यांनी केले. सर्व शिक्षिकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले. शेवटी ‘वंदे मातरम’ च्या सुराने कार्यक्रमाची सांगता झाली.






